Sunday, October 12, 2014

Dr.Kailash Satyarthi:त्यांचं हरवलेलं शैशव जपण्यासाठी ...Pl.find my cover story below,on Dr.Kailash Satyarthi ji,published in Tarun Bharat(akaksha suppl.)dated 28th May 2011.

Pl.find my cover story below,on Dr.Kailash Satyarthi ji,published in Tarun Bharat(akaksha suppl.)dated 28th May 2011.
The article:
त्यांचं हरवलेलं शैशव जपण्यासाठी ...
-रश्मी घटवाई
एवढ्यात दिल्लीत एका बालमजुरावर अत्याचार होऊन त्याला आपले प्राण गमवावे लागले.त्यामुळे राजधानी दिल्लीतसुद्धा बालमजुरी,बालशोषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आपोआप सिद्ध झालं. 
मुले ही 'देवाघरची फुले'असं आपण किती ही म्हटलं,तरी त्यांना पायदळी तुडवणारेही कमी नाहीत.आजही खूप कमी पैशात उपलब्ध होतात म्हणून, अतिशय घातक(hazardous ) अशा उद्योगांत,पुरेशा अन्न-पाण्याविना, अस्वच्छ ठिकाणी लहान मुलांना कामाला जुंपले जाते. गालिचे विणणे, जरीवर्क, ज्वेलरी,वस्त्र उद्योग अशा ठिकाणी मुलगे नी धुणी-भांडी-घरकाम,मुले सांभाळणे वगैरेसाठी मुली आपलं कोवळं वय विसरून राबत राहतात. त्यांना वेश्याव्यवसायात जबरदस्तीनं धाडलं जातं.बालमजुरी,बाल-लैंगिक शोषण ह्यांनी लाखो-करोडो बालकांच लहानपणच कुस्करून टाकलं आहे.ह्या लहानग्यांना वाचवण्यासाठी,त्यांचं हरवलेलं शैशव जपण्यासाठी काही जणांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले आहेत, त्यापैकी एक मोठी व्यक्ती म्हणजे डॉ.कैलाश सत्यार्थी! बालमजुरांच्या छळाबद्दलच्या विरोधात ,बाल-लैंगिक शोषणाच्या विरोधात राष्ट्रीय नी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवणाऱ्या 'बचपन बचाव आंदोलन'चे सर्वेसर्वा डॉ.कैलाश सत्यार्थी यांच्याशी मी मनमोकळी बातचीत केली.
डॉ.कैलाश सत्यार्थी हे मध्यप्रदेशातल्या विदिशाचे, शिक्षणानं इलेक्ट्रीकल इंजिनीअर. चांगली नोकरी सोडून देऊन त्यांनी 'बचपन बचाव आंदोलन' ही सेवाभावी संस्था सुरु केली, बाल मजुरीच्या, बाल-लैंगिक शोषणाच्या विरोधात झोकून देऊन काम करायला सुरुवात केली,त्यामागची प्रेरणा काय होती,ह्या माझ्या प्रश्नावर ते सांगतात-"मुळात माझ्या शाळेचा पहिला दिवस हाच माझ्या या कार्याचा प्रेरणास्त्रोत आहे.मी पहिल्या दिवशी शाळेत गेलो,तेव्हा शाळेजवळच एक लहानसा मुलगा आपल्या वडिलांसमवेत उन्हात बसून जोड्यांना पॉलिश करत होता. त्याची नी माझी नजरानजर झाली.आम्ही सगळी मुलं चांगले कपडे घालून, व्यवस्थित तयार होऊन शाळेत गेलो होतो.तो मुलगा एकटक आमच्याचकडे बघत होता.आम्ही तसेच वर्गात गेलो.शिक्षकांना विचारलं तो मुलगा बाहेर का उभा आहे म्हणून,तर त्यांनी मला नवीन मित्रांमध्ये रमायला सांगितलं." ते सांगतात.तेव्हा मग सत्यार्थी हेडमास्तरांकडे गेले.त्यांचा त्यांच्याशी कौटुंबिक परिचय होता.त्यांना त्यांनी त्या मुलाबद्दल सांगितलं.'त्याचे आई-वडील गरीब आहेत'असं सांगून हेडमास्तरांनी त्यांची समजूत घातली.तरी हा विषय त्यांच्या डोक्यातून जाईना! तो गरीब मुलगा त्यांना रोज भेटायचा.त्याचे वडीलही दिसायचे.शेवटी नं राहवून, धीर एकवटून सत्यार्थी ह्यांनी एक दिवस थेट त्याच्या वडिलांनाच विचारलं-"इसे स्कूल क्यो नही भेजते?"त्यावर तो गरीब माणूस काही क्षण बोलूच शकला नाही.त्याच्या तोंडून शब्दच फुटेना! थोड्या वेळानं तो म्हणाला,"बाबूजी हम तो काम करने के लिये ही पैदा हुए हैं. मैं ही नही,मेरे पिता, दादाजी..सारे यही काम करते आये हैं.अब आगे मेरा बेटा भी यही काम करेगा !" त्याच्या ह्या उत्तरामुळे सत्यार्थी गहन विचारात पडले."कुछ लोग काम करने के लिये ही पैदा होते हैं.कुछ लोग उपभोग के लिये पैदा होते हैं."हा विचार त्यांची पाठ सोडेना त्यांचे अनेक सहाध्यायी गरिबीपायी पुढे शिकू शकले नाहीत,तर पुस्तकांअभावी काहींना शाळा सोडावी लागत होती. हे सर्व बघून त्यांची अस्वस्थता वाढत गेली.ह्यांच्यासाठी आपण काय बरं करू शकू,हा विचार वयाच्या अकराव्या वर्षी त्यांच्या डोक्यात फिरू लागला. त्यांची स्वत:ची सहावीची परीक्षा होऊन,उत्तम निकाल लागून ते उत्तीर्ण झाले होते.त्याबाबत बक्षीस म्हणून घरच्यांनी त्यांना रोख रक्कम दिली होती.आणखी रमेश नावाचा त्यांचा एक मित्र ही चांगला उत्तीर्ण झाला होता.दोघांनी मिळून बक्षिसाच्या रकमेतून एक हातठेला भाड्यानं घेतला आणि घरापासून दूर असलेल्या कॉलनीत जाऊन जाऊन जोरजोरात ओरडून आपली नको असलेली शालेय पुस्तके देण्याबाबत दोघेहीजण लोकांना विनंती करू लागले.बघता-बघता दोन हजार पुस्तके जमली.त्यांत अगदी सर्व वर्गांची,अगदी मेडिकल नी इंजिनीअरिंगचीही पुस्तके जमली. मित्राचे वडील स्टेशन-मास्तर होते,त्यांच्याकडे त्यांनी ही पुस्तके ठेवली.हेड-मास्तरांच्या नी शिक्षकांच्या कानावर त्यांनी हा प्रकार घातला,तर ते खूपच भारावले,प्रभावित झाले.मग त्यांनी 'शंकराचार्य पुस्तकपेढी 'सुरु केली.त्यात खूप लोक उत्साहानं सामील झाले.जवळ-जवळ सहा हजार पुस्तके त्यात होती.विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी ती पुस्तके विनामुल्य वापरण्यासाठी दिली जात.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला.
पुढे ते इलेक्ट्रीकल इंजिनीअर झाले.त्याच कॉलेजमध्ये त्यांनी शिकवलंही. High Voltage Transformer Design हा त्यांचा स्पेशलायझेशनचा विषय होता.सुमेधाजींशी विवाह होऊन पुढे ते दिल्लीला आले.इथे त्यांनी 'संघर्ष जारी रहेगा'नावाचं मासिक काढलं."समाज के हाशिये के तबके के बाहर के लोगोंपर-जैसे रिक्षावाले,कपडे प्रेस करनेवाले, कचरा बीननेवालोंपर,उन समुदायोन के इंटरव्यू करके मै लिखता था. अनेक जण समाज-परिवर्तन करीत होते.अशा नि:स्वार्थ भावनेनं कार्य करणाऱ्यांविषयीही मी लिहिलं."ते सांगतात.
हे सगळं कार्य १९८१ च्या सुमारास ते करीत होते.एक दिवस बासलखान नावाचा गरीब मजूर त्यांना शोधत-शोधत आला नि कार्यालयात पोहोचताच चक्कर येऊन खाली कोसळला. शुद्धीवर आल्यावर तो सांगू लागला की सतरा वर्षांपूर्वी काही लोकांनी गोड बोलून त्याला,त्याच्या परिवाराला नि आणखी काही जणांना वीटभटटयांमध्ये ' बॉन्डेड लेबर' म्हणून काम करायला जालंधर -लुधियानाच्या मध्ये असलेल्या 'सरहिंद'ह्या ठिकाणी नेलं.त्याची मुलगी कालांतरानं चौदा वर्षांची झाली. वीटभट्टीचा मालक तिला दलालाला विकण्यासाठी सौदा करू लागला.दलाल आणि मालक त्या मुलीच्या अंगावरून हात फिरवून तिची किंमत ठरवत होते.दलाल चौदा हजार देऊ करत होता,तर वीटभट्टीचा मालक सतरा हजार मागत होता.त्यामुळे सौदा काही ठरत नव्हता.मुलीवर होणारा तो अत्याचार बघून तिची आई आक्रंदत होती.बापही मनातल्या मनात आक्रोशत होता.
रात्री ट्रकमध्ये विटा चढवून झाल्यावर,हा बासलखान मदत मागण्यासाठी म्हणून ट्रक जिथे जाईल,तिथे जाण्यासाठी जिवावर उदार होऊन ट्रक मध्ये लपून बसला.ट्रक चंदिगढला पोहोचला.हा कसाबसा धक्के खात एका वकिलाकडे पोहोचला.ते वकील सुस्वभावी होते,सत्यार्थींच्या मासिकाचे वाचक नि वर्गणीदार होते.त्यांनी त्याला सत्यार्थींकडे जाण्यास सुचवलं. पैसे नसतानाही मदतीची याचना करण्यासाठी बासलखान सत्यार्थींकडे येऊन पोहोचला.
मग कैलाश सत्यार्थी त्यांच्या एका फोटोग्राफर मित्राला घेऊन त्या वीटभट्टीवर थडकले.वीटभट्टीच्या मालकानं बाकीच्या मजुरांना बरीच मारहाण, शिवीगाळ केली,ते सर्व सत्यार्थींनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलं.ही सगळी स्टोरी त्यांनी इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रकाशित केली.त्यांच्याकडे एव्हिडन्स होताच. त्यांनी या प्रकरणी कोर्टात हबीअस कॉरपस Habeas corpus याचिका दाखल केली. जज्जनीसुद्धा त्यांची ती स्टोरी वाचली होती.त्यांनी तुरंत ह्या सर्व बॉन्डेड लेबर्स ना ७२ तासांच्या आत मुक्त करण्याचे आदेश दिले.तर पंजाब पोलीस दुसऱ्याच दिवशी सर्व बॉन्डेड लेबर्सना घेऊन आले व त्यांना मुक्त केलं.
सत्यार्थींनी केलेली ही स्टोरी बॉन्डेड लेबर्स,गुलामगिरीवरची पहिलीवहिली खबर होती.त्यामुळे समाजात एकच खळबळ माजली.मग लोक त्यांना अशा प्रसंगी बोलवू लागले.एक आंदोलन उभं झालं.
"भारतात आज साडेपाच ते सहा करोड मुलं मजुरी करताहेत.अन सहा करोड बेरोजगार आहेत,तर जगात अठरा करोड बालमजूर आहेत,नी साडे अठरा करोड बेरोजगार आहेत. ह्याचाच अर्थ हे बेरोजगार लोक तेव्हढ्या मुलांना कामाला जुंपून त्यांच्या जीवावर आयतं बसून खातात." ते सांगतात.
" सिग्नलवर फुगे,मासिके विकणारी मुलं असतात.त्यांच्या करवी दुसराच कोणी ती विकत असतो.सिग्नलवर हातात तान्हे मूल,दुधाची बाटली घेऊन एखादी भिकारीण पैशासाठी दयायाचना करीत असते,ते मूल तिचं नसतंच! मानवीय करूणा को exploit एकस्प्लोईट करके वे पैसे कमाते हैं.त्यांच्यावर नजर ठेऊन मागे त्यांचे एजंट बसलेले असतात. या दलालांचे अड्डे असतात.त्यांच्या टोळ्या ठरलेल्या असतात.त्यांचा एरिया ठरलेला असतो.त्या प्रत्येकाची बोली लागते.एखादा उठून दुसऱ्याच्या हद्दीत शिरकाव नाही करू शकत.सारी 'मिलीभगत' होती है.दिल्ली से हर दिन छ:बच्चे चोरी होते हैं," ते सांगतात.
१९८० सालापासून आजतागायत 'बचपन बचाव आंदोलन' नी डॉ.कैलाश सत्यार्थी ह्यांनी सुमारे ७८ हजार बालकांना बालमजुरी, बाल-शोषण ह्यांच्या विळख्यातून मुक्त केलंय.ह्या मुक्त केलेल्या बालकांचं पुनर्वसन मुक्ती आश्रम,शिक्षण बालाश्रम इथे ते करतात...हरवलेलं त्यांचं शैशव पुन्हा जमेल तेव्हढ मिळवून देतात.
rashmighatwai12@gmail.com